
नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आठ ते 22 जून या दरम्यान महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार शहर आयुक्तालय हद्दीमध्ये मनाई आदेश लागू केले आहेत. येत्या 17 तारखेला बकरी ईद सण आहे .राज्यातील विविध राजकीय पक्षांमधील फूट व त्यामुळे होणारे आरोप – प्रत्यारोप त्याचप्रमाणे सामाजिक, राजकीय, वेगवेगळ्या प्रकरणे यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे तसेच मराठा , धनगर ,ओबीसी , आरक्षणासंदर्भात आंदोलने सुरू असल्यामुळे या साऱ्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता कायम राहावी कायदा व सूव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आठ ते 22 जुन दरम्यान पंधरा दिवसांसाठी शहरात मनाई आदेश लागू केले आहेत. त्यानुसार नागरिकांना कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ सोबत नेता येणार नाही. दगड , शस्त्र , लाठ्या , बंदुका बाळगता येणार नाही . कोणत्याही व्यक्तीचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा प्रतिमेचे प्रदर्शन किंवा दहन करता येणार नाही. आरडा ओरड, वाद्य वाजवण्यास बंदी असेल. प्रक्षोभक भाषण ,वर्तनुकीस बंदी घालण्यात आली आहे . सार्वजनिक ठिकाणी महाआरती करणे, वाहनावर झेंडे लावून फिरणे ,पेढे वाटणे, फटाके फोडणे ,घंटानात करणे, शेरीबाजी करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. पूर्वपरवानगीशिवाय पाच किंवा पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र जमण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाची उल्लंघन करणारे महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 कलम 135 नुसार शिक्षेस पात्र राहतील. असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.